Home Breaking News . *संपादकीय लेख*

. *संपादकीय लेख*

चुलता-पुतण्या’ वादात न पडता ‘विकासाचे राजकारण’ करणारी वसंतरावजी नाईक-सुधाकररावजी नाईक यांची जोडी*

राज्यात सध्या राजकारणात चुलत्या- पुतण्यात यादवी होऊन राजकीय पक्षात फाटाफुट होऊन पक्षाची वाताहत झाल्याचे अनेक उदाहरणे पाहावयास मिळतात. तसेच महाराष्ट्रात चुलता- पुतण्याचं राजकारण यशस्वी झालं नाही असे अनेक बोलतात. चुलता-पुतण्यावादाचे मुख्य कारण म्हणजे पुतण्यास डावलून मुलाला जास्त महत्व देऊन महत्वाची पदे दिली गेली असल्याने पुतण्याने पक्षात बंडखोरी करुन पक्षात फोडाफोडी करूण दुसरा पक्ष स्थापन केलेला आहे. अथवा पक्षांतर करुन काकास राजकारणात अडसर निर्माण केला आहे. मात्र राजकारणातील या सर्व चुलता-पुतण्याच्या नकारात्मक अख्यायिकेत एक चुलता-पुतण्याची जोडी अपवाद ठरली असून या जोडीने मिळून तब्बल जवळजवळ १४ वर्षे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी प्रगत राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळले आहे, ती जोडी म्हणजे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक आणि सुधाकररावजी नाईक हि होय. या जोडीतील काका वसंतरावजी नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सतत तब्बल एकरा वर्षे दोन महिने आठरा दिवस (११ वर्ष, २ महिने, १८ दिवस) सांभाळून आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करत महाराष्ट्राचा कायापालट केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पाच वर्षीपेक्षा जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर आजपर्यंत एकाही नेत्याला राहता आले नाही, तर पुतण्या सुधाकररावजी नाईक देखील जवळजवळ अडीच वर्षे (२.५ वर्ष) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कायम होते.

*बाळासाहेब ठाकरे-राज ठाकरे*

काका-पुतण्याच्या कुरघोडीच्या राजकारणाला प्रथम शिवसेनेतून सुरूवात झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या कार्याध्यक्षपदी पुतणे राज ठाकरे यांची नेमणूक न करता मुलगा उध्दव ठाकरे यांची वर्णी लावली. राज ठाकरे यांची वक्तुत्वशैली बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे अतिशय प्रखर होती. त्यामुळे ते पक्षात उध्दव ठाकरे यांच्यापेक्षा काहीसे लोकप्रिय होते. परंतू बाळासाहेब ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांना अधिक पसंती दिल्याने राज ठाकरे कमालीचे दुखावले गेले. पुढे त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. त्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाल्याचे जाणकार सांगतात.

*गोपीनाथराव मुंढे-धनंजय मुंढे*

त्यानंतर दुसरी यादवी माजी उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथरावजी मुंडे यांच्या घरात सुरू झाली. गोपीनाथ मुंडे भाजपचे वजनदार नेते होते. त्यांनी भटा ब्राम्हणाचा, शहरी लोकांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपा पक्षाला सर्व सामान्य माणसांचा पक्ष म्हणुन ओळख मिळवून देऊन पक्षाला सुगीचे दिवस प्राप्त करून दिले. गोपीनाथराव मुंढे हे बीड मधून लोकसभेवर निवडून गेल्यावर पुतण्या धनंजय मुंडे यांना विधानसभेची उमेदवारी न देता मुलगी पंकजा पालवे मुंडे यांना उमेदवारी देऊन आमदार बनविल्याने पुतणे धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाले. त्यांनी सरळ राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करुन गोपीनाथ मुंडे यांना राजकारणात शहकाटशह देणे सुरु केले.

*शरद पवार-अजित पवार*

महाराष्ट्रात काल तिसरा काका-पुतण्याचा संघर्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पहायला मिळाला. शरद पवार यांना मुलगा नसल्याने पुतण्या अजित पवार यांना शरद पवार यांचा राजकीय वारस म्हणून पाहिले जाऊ लागले. काही वर्षे शरद पवार यांनी अजित पवार यांना राजकारणात महत्वाची पदे बहाल केली, परंतू काही वर्षांपासून मुलगी सुप्रिया सुळे यांना पक्ष संघटनेत तथा राजकारणात महत्व दिले जाऊ लागल्याने मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा असलेले अजित पवार कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी विरोधी पक्षनेते पद काढून प्रदेशाध्यक्ष बनवण्याची मागणी केली, परंतू त्याकडे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दुर्लक्ष केल्याने पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपशी हात मिळवणी करून उपमुख्यमंत्री पदाची माळ तीन वर्षात तिसऱ्यांदा गळ्यात पाडून घेतली. आणी काका-पुतण्याच्या संघर्षाला पुनः सुरुवात झाली आहे.

*वसंतरावजी नाईक-सुधाकरराव नाईक*

महाराष्ट्रात काका-पुतण्याचा संघर्ष सर्वश्रुत असतांना मात्र माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांची जोडी याला पूर्णतः अपवाद ठरली आहे. वसंतरावजी नाईक यांना अविनाश नाईक आणि निरंजन नाईक अशी दोन मुले असतांना देखील त्यांनी पुतणे सुधाकरराव नाईक यांना संरपंच पदापासून ते थेट मुख्यमंत्री अश्या महत्वाच्या पदावर नेऊन बसविले. राजकारणापासून दूर राहू इच्छिणाऱ्या स्वत:च्या मुलास राजकारणापासून दूर ठेवले. त्यांनी ठरवले असते तर पुतण्यापेक्षा मुलास जवळ केले असते मात्र राजकारणातील सुसंस्कूतपणा जपणारे सुसंस्कुत राजकारणी म्हणून ओळख असलेल्या वसंतरावजी नाईक यांनी पुतणे सुधाकररावजी नाईक यांना राजकारणात पुढे करून आदर्श निर्माण केला आहे.

*रितेश हरीष पवार, मुंबई*
(कोषाध्यक्ष,वसंत-विचारधारा मंच,महाराष्ट्र)
*संपर्क:-* +919653236671

Previous articleशिवतेज शिरफुले यांची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी निवड.
Next article“समान नागरी कायदा समज-गैरसमज!”